वालचंदनगर – कळंब रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य, सतत पाणी गळतीने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचा, अपघातास आमंत्रण…..वाहन चालक त्रस्त
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
वालचंदनगर कळंब रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन थाटामाटात वाजत गाजत होऊन दहा दिवस उलटून गेल्यावरही अद्याप दुरुस्तीच्या कामाची सुरुवात तर राहीलीच त्याची पूर्वतयारीही अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली नसल्याने रस्त्याचे काम नक्की होणार कां की, भूमिपूजन कार्यक्रमातील राज्यमंत्र्यांचे भाषण या हवेतल्या गप्पा ठरणार ? असा सवाल लोक विचारीत आहेत.
वालचंदनगर कळंब या दोन किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारमधील राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी थाटामाटात झालेल्या समारंभात राज्यमंत्री भरणे यांनी या रस्त्याच्या कामासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर केले असल्याचे मोठय़ा दिमाखात सांगितले. आपल्या भाषणात सुरुवातीला त्यांनी या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये त्यानंतर आणखी कमी पडले तर तीन कोटी रुपये आणि आणखी लागले तर साडेतीन कोटी रुपयेपर्यंत आपण निधी देऊ असे सांगितले हाेते. त्यावेळी मंत्रिमहोदयांच्या या उदार नीतीचे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले होते. वास्तविक सध्या ज्या रस्त्याच्या कामासाठी मंत्रिमहोदय साडेतीन कोटी रुपयेपर्यंत निधी देण्यास तयार आहेत तोच रस्ता एप्रिल- १९ मध्ये सव्वा कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता. मात्र तत्कालीन ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अल्पावधीतच हा रस्ता अत्यंत खराब झाला. या रस्त्याच्या वालचंदनगर औद्योगिक शहरातील प्लेट शॉपजवळील पोस्टाच्या पुलापासून भारत विहारच्या कडेने जाणारा सुमारे तीनशे मीटरचा रस्ता व त्यानंतर कारंजा चौका पासून पुढे वालचंदनगर हॉस्पिटलसमोरून श्री वर्धमान विद्यालया जवळून नारळीबागेच्या कोपऱ्यापर्यंत जाणारा ४०० मीटरचा रस्ता वाईटात वाईट असा झालेला आहे. या दोन्ही ठिकाणी पाण्याची गळती होत असल्यामुळे सातत्याने रस्ता खराब होतो म्हणून या वेळच्या मंजूर निधीतून प्लेट शॉप चौक ते भारत विहार समोरचा कॅनॉल पूला पर्यंत तसेच दवाखाना ते नारळीबाग कोपऱ्यापर्यंत सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. लोकांची ही याच पध्दतीने त्या ठिकाणचा रस्ता केला जावा अशी आग्रही मागणी होती. त्यानुसार लोकप्रिय लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला व जनतेच्या आग्रही मागणीप्रमाणे पाहिजे त्या ठिकाणी त्याचे काँक्रीटीकरण करण्याचेही मंजूर झाले परंतु अद्याप या कामाच्या पूर्वतयारीला ही सुरुवात झालेली नाही कामासाठी लागणारे कसलेही मटेरियल याठिकाणी अद्याप आलेले नाही त्यामुळे भूमिपूजन कार्यक्रमात ज्या कांही गोष्टी सांगितल्या गेल्या त्या बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी तर होणार नाही नां ? अशी शंका लोक बोलून दाखवत आहेत . श्री वर्धमान विद्यालयाजवळ या रस्त्याची इतकी वाईट अवस्था झाली आहे की केंव्हाही एखादी अघटित दुर्घटना घडू शकते. शाळा सुटल्यावर या रस्त्यावरून जाणारे विद्यार्थी आणि दैनंदिन दुचाकी वरून प्रवास करणारे नागरिकांना सध्या आपला जीव मुठीत धरून या तीनशे मीटरच्या वाईटात वाईट झालेल्या भागातून जावे लागते. अशावेळी समोरून एखादा मोठा ट्रक किंवा अवजड वाहन आल्यास दुचाकीस्वाराची अत्यंत तारांबळ होते. समोरून येणारे किंवा पाठीमागून येणारे अवजड वाहन जाईपर्यंत बाजूला जाऊन थांबण्याची संधीही त्या दुचाकीस्वाराला या भागात मिळत नाही. ही सगळी जीवघेणी तारांबळ थांबण्यासाठी या रस्त्यांच्या कामाची तातडीने सुरुवात करावी अशी या भागातील लोकांची मागणी आहे.
या कामाविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग भिगवण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सदर रस्त्याच्या कामाला आम्ही १० जानेवारी नंतरच्या आठवडय़ात सुरुवात करणार आहोत असे सांगितले.
