छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श सर्वांनी घ्यावा – मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येकाने जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वाटचाल करावी, असे आवाहन मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला रविवारी दिनांक 19 शुभेच्छा व्यक्त केल्या.
हर्षवर्धन पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. महाराजांनी राबवलेल्या धोरणांमुळेच आजही सामाजिक एकोपा आपणास दिसून येत आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले. 
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकास न्याय दिला, जगण्याचा हक्क दिला,अठरा पगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्मिती केली. प्रशासन हे सर्वसामान्य जनतेसाठी राबवायचे असते, असा आदर्श त्यांनी घालून दिला. स्त्रियांना सन्मान दिला, जनतेला त्यांनी सुरक्षितता दिली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांची जगाला दखल घ्यावी लागली असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. शिवजयंती निमित्त मंडळांनी मिरवणुकी बरोबर सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहनही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
