राजन गवस यांच्या कादंबरीवर ‘रिवणावायली”चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ! 8 एप्रिलला होणार चित्रपटगृहात प्रदर्शित
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क ) सचिन तरंगे
आधुनिक जगतात वावरत असताना स्त्री ला तिच्या हक्कासाठी तिच्या स्वातंत्र्यासाठी लढावं लागतच आहे.
रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं; एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली मांडते.
‘बिटरस्वीट’ या चित्रपटासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेती अक्षया गुरव ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी जटणाऱ्या ‘ऐश्वर्या देसाई’ या बंडखोर मुलीची ही कथा आहे.
जुन्या रूढी परंपरा आणि लग्नाच्या बेडीत स्त्रिया अडकून जातात, अनेकदा इच्छा असून सुद्धा त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वागता येत नाही .हे सगळं घडत असतानाच अनेकदा आपल्या आयुष्यभराचा सोबती असलेला आपला जोडीदाराकडून स्वतःची होणारी मुस्कटदाबी ही स्त्रीच्या अंतःकरणातला आक्रोश बाहेर आणते.
याचंच बंडखोर चित्रण या ‘रिवणावायली’ मध्ये चित्रित करण्यात आलं आहे.
निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे.संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत.
चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. प्रा राजन गवस यांच्या जोगवा,व इतर कादंबरीवर आधारित विविध चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.
