लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार की अजूनही घरूनच काम करणार ?
भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचा सवाल
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )
नागरिकांसाठी लोकल सुरु करण्यात यावी, असा रेटा गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष तसेच जनतेने लावून धरला होता. यानंतर राज्य सरकारने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून लोकल सुरु करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. लसीचे दोन डोस घेतलेले सामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करतील, परंतु दोन डोस झालेले मुख्यमंत्री मंत्रालयात जातील का?, असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, लसीचे दोन डोस झालेले सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करतील. परंतु दोन डोस झालेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार का? गर्दी टाळण्यासाठी तुम्ही स्वत:ची मर्सडीज चालवत असल्याने तसंही बारकोड स्कॅनिंगचा अडथळा नाही.
तसेच लसीच दोन डोस झालेल्यांना जे नियम आहेत ते स्वत:साठी अमलात आणणार की अजूनही वर्क फ्रॉम होम करणार? असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे. केशव उपाध्ये यांनी केलेल्या या खोचक प्रश्नांवर ठाकरे सरकार काय प्रतिउत्तर देणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
