गट विकास अधिकारी यांनी तालुका पातळीवर दर ३ महिन्यांनी “सरपंच सभा” आयोजित कराव्यात !
शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी ….
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याबाबत अनेक तक्रारी / निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत. याबाबी विचारात घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गट विकास अधिकारी यांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत.
ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी तालुका पातळीवर सरपंच सभा आयोजित करावी.
सदर सभेत संबंधित पंचायत समिती विस्तार अधिकारी (पंचायत) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी व ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी/ गान्हाणी / अडचणींची सोडवणूक करावी.
सदर सभा दर ३ महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी व ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याच दिवशी सदर सभेचे आयोजन करावे.
गट विकास अधिकारी यांनी सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा.
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडून सदर सभेचा अनुपालन अहवाल एकत्र करून संबंधित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात सादर करावा.
सर्व विभागीय आयुक्त यांनी विभागातील सर्व जिल्ह्यातून झालेल्या सभेचा अनुपालन अहवाल प्राप्त करून एकत्रितपणे शासनास दहा दिवसात सादर करावा.
