भारतीय स्वातंत्र्य दिनी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कामगारांचे विविध मागण्यांबाबत कंपनीच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
वालचंदनगर : वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कामगारांचे गेली कित्येक वर्ष विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे, गेली कित्येक वर्षे थकीत असलेले कामगारांची देणी व तीन महिन्याचे मासिक वेतन. यासाठी विविध संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी कामगारांच्या होणाऱ्या आर्थिक कुचंबना व उपासमारीबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी कामगारांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनी उपोषणाचे हत्यार उपसले.
यावेळी कामगारांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, वालचंदनगर कंपनी प्रशासनाला आमच्या व्यथा व अडचणी याबद्दल काहीही घेणे देणे नाही. कामगारांची वेळोवेळी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज स्वातंत्र दिनी कामगारांना आपले हक्कासाठी उपोषण करावे लागते, ही या प्रशासनाच्या व्यवस्थेची फार मोठी शोकांतिका आहे, आम्ही आता हे यापुढे सहन करणार नाही. आमच्या मागण्यांसाठी लढा देत राहो, अशा प्रतिक्रिया कामगारांनी वालचंद नगर कंपनी प्रशासना विरोधात व्यक्त केल्या.
कामगारांनी इंडस्ट्रियल कोर्ट पुणे येथे दाद मागितली असून व कामगार आयुक्त पुणे यांच्याकडे देखील तक्रार दाखल केली असून, अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे सकारात्मक प्रश्न सुटलेला नाही. म्हणून 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कामगारांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. भविष्यात कामगारांच्या प्रश्नासाठी सकारात्मक भूमिका घेऊन सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत अन्यथा आणखी तीव्र पद्धतीने आंदोलन करावे लागेल, असा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड च्या प्रशासनाला दिला आहे.

कामगारांच्या या लढ्यास विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये पुणे जिल्हा शिक्षक संघटना अध्यक्ष संतोष कदम, भाजपा सोशल मीडिया इंदापूर ता.अध्यक्ष विक्रम मोरे, भाजपचे अनुसूचित जमातीचे तालुकाध्यक्ष अंबादास कांबळे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्ष पूनम निंबाळकर व इंदापूर तालुका सचिव तनया जाधव, शांती सूर्य सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य रत्नपूरी अध्यक्ष घनश्याम निंबाळकर, महेंद्र शिवचरण, प्रकाश धांडोरे, सागर काटे, सचिन सावंत, समाधान बाबर, सोनू शेख, भारतीय युवा पॅंथरचे अध्यक्ष गौरव अहिवळे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे आदींनी व पंचक्रोशीतील वालचंदनगर, कळंब,रणगांव,अंर्थुर्णे व शिरसटवाडी ग्रामपंचायत सरपंच यांनी तसेच शेकडो कामगारांनी जाहीर पाठिंबा दिला.
