
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
शुक्रवार,दि.10 : सभ्य व सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो पत्रकारावर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कायद्याने गुन्हे दाखल करायला टाळाटाळ केले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्भीडपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे.
महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते, यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा चार चाकी गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे, हे उघडच आहे. शशिकांत यांनी विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच दिवशी चार चाकी गाडीने त्यांना जोरदार धडक होते यात वारीसे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला खूनच आहे. या घटनेचा राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा या घटनेची सुनावणी फास्टट्रॅक जलद गती न्यायालयामार्फत मार्फत व्हावी अशी आमची मागणी आहे. हल्ला झालेले पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे. या राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्याचे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने भविष्यात प्रयत्न व्हावेत, अशी इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाने निवेदनात विनंती केली आहे.
