पूर टाळण्यासाठी नद्यांकाठची अतिक्रमणे हटवण्याचे आदेश,
वडनेरे समितीच्या उपायांची कार्यवाही करा…जयंत पाटील
पुणे : गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता यंदा पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात पूर येऊ नये म्हणून कृष्णा खोऱ्यातील नद्यांकाठची अतिक्रमणे तातडीने हटवावीत,
त्यानंतरही अतिक्रमणे झाल्यास तातडीने कारवाई करावी,
पूररेषा नियंत्रणाबाबत कठोर अंमलबजावणी करावी,
अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा पुणे विभागाला दिल्या.
तसेच पुराबाबत वडनेरे समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची कार्यवाही करावी,
असेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील सिंचन भवन येथे कृष्णा भीमा खोऱ्यातील नद्यांना पावसाळ्यात येणारा पूर आणि धरणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पाटील यांनी हे आदेश दिले.
ते म्हणाले, ‘कृष्णा खोऱ्यातील नद्यांना पावसाळ्यात येणारा पूर नियंत्रित करण्यासाठी यंदा विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.
त्यामध्ये टेंभू आणि कोयना सिंचन योजनेमध्ये पावसाळ्यात धरणांमधून विसर्ग सुरू असताना पंपाद्वारे जास्त पाणी उचलून ते दुष्काळी भागाला द्यावे.
संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी गेल्या वर्षी वडेनेरे समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे.
या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी चालू वर्षीपासून करण्यात यावी.
त्यामुळे तारळे आणि आसपासच्या भागात येणारे पुराचे पाणी नियंत्रित करण्यास मदत होईल.
पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेजारच्या राज्यांशी चर्चा सुरू आहे.
’ विविध १७५ धरणांच्या दरवाजांना संवेदक (सेन्सर) बसवले आहेत.
या संवेदकांमुळे धरणात किती पाणीसाठा झाला आहे,
धरणामधून नदीमध्ये किती पाणी सोडले याचा अंदाज येतो.
