मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ आज गृहमंत्र्यांची भेट घेणार
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
1917 मध्ये राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतर पत्रकारांवरील हल्ल्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. परंतु अलीकडे पोलीस, राजकारणी व त्यांचे हस्तक आणि वाळू माफियांकडून होणारे वाढते हल्ले ही चिंतेची बाब असून शारिरीक हल्ले करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही, असा राज्यकर्त्यांना इशारा देत चाकूर, श्रीगोंदा, केज, मुंबई येथीलच पत्रकारांच्या संदर्भात गेल्या दोन दिवसात घडलेल्या घटनांच्या संदर्भात आज आम्ही गृहमंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांना भेटत आहोत.
राज्यात पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत. ते थांबवायचे असतील तर पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तशी मागणी आम्ही करणार आहोत. तसेच पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासूनच मग गुन्हे दाखल केले जावेत अशी विनंती ही आम्ही गृहमंत्र्यांकडे करणार आहोत.
पत्रकारांनीही वाढत्या हल्ल्यांच्या कारणांचा गंभीरपणे विचार करून कोणताही भेद न बाळगता एकजूट दाखविली व लेखणीच्या माध्यमातून आणि गरज पडेल तेव्हा रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आवाज उठविला तर माध्यम प्रतिनिधींकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही असे आवाहनात्मक प्रतिपादन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक व अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकान्वये पत्रसुष्टीला केले आहे
