⭕चालकांची मानसिकता बदलण्याची गरज……
डॉ. भूषणकुमार उपाध्याय,
राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) वाहतूक नियमांचे पालन न केल्याने राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात.
यामध्ये महामार्गांवरील अपघातांची संख्या जास्त आहे.
वाहनांची वाढलेली संख्या,
वाहतूक नियमांचे न होणारे पालन,
अपघातांचीही वाढणारी संख्या आणि ती कमी करण्याचे आव्हान महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर आहेत.
अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांत यंत्रणा कमी पडल्या.
परंतु तात्काळ मदतीसाठी महामार्ग पोलीसही सरसावले आहेत.
यावर राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी केलेली चर्चा.
’ राज्यातील महामार्गाची संख्या व त्यांचा आवाका मोठा आहे.
हा आवाका पाहता महामार्ग पोलिसांसमोरील आव्हाने कोणती आहेत?
राज्यात राष्ट्रीय महामार्ग १७,७२५.१६ किलोमीटर आणि राज्य महामार्ग ३५,७५४.६८ किलोमीटरचे असून यामध्ये मुंबई-पूणे द्रुतगती मार्ग ९४.५ किलोमीटरचा आहे.
महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्याही नेहमीच जास्त असते.
वर्ष २०२० मध्ये राज्यात एकूण २५ हजार ४५७ रस्ते अपघात नोंद झाले असून यामध्ये ११ हजार ४५२ जणांनी आपला जीव गमावला आहे.
अतिवेगाने, धोकादायक रीतीने, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, दारू पिऊन किंवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविल्याने सर्वाधिक अपघात होतात.
अपघात रोखणे वाहतूक पोलिसांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे.
मे.सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने राज्यातील महामार्गावर होणाऱ्या रस्ते अपघातामध्ये होणारी जीवितहानी दरवर्षी १० टक्क्याने कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.
