पानशेत धरणफुटीची ‘साठी’,
जलप्रलयाच्या स्मृतींनी अजूनही अंगावर येतो काटा
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे : पानशेत धरण फुटून १२ जुलै १९६१ रोजी पुण्यात झालेल्या जलप्रलयाला सोमवारी साठ वर्षे पूर्ण होत आहेत.
पुराच्या पाण्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त केले.
काही वेळातच अनेकांचे संसार वाहून गेले आणि होत्याचे नव्हते झाले.
त्या आठवणी आमच्याबरोबर कायमस्वरूपी आहेत आणि दरवर्षी १२ जुलै आला की पानशेत धरणफुटीच्या स्मृतींनी अजूनही अंगावर काटा येतो,
अशी भावना पुराने बाधित झालेल्या प्रमिला ढेरे आणि प्रकाश आठवले यांनी व्यक्त केली.
१२ जुलै रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत घरण फुटले आणि पुराचे पाणी शहरात शिरले.
बंडगार्डन पुलाचा अपवाद वगळता शहरातील सर्व पूल पाण्याखाली गेले होते.
शनिवार, नारायण, कसबा आणि सोमवार पेठ भागातील घरांची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली.
अनेकांचे संसार पुराच्या पाण्याने वाहून गेले.
या आपत्तीतून सावरण्यासाठी पुढे बराच कालावधी गेला.
शनिवार पेठेतील अमृतेश्वर मंदिराजवळच्या एका वाडय़ामध्ये ६० वर्षांपूर्वी राहणाऱ्या प्रमिला ढेरे या लोकसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक-साहित्यिक
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या भगिनी आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांची आत्या आहेत.
तर, नेने घाट परिसरात वास्तव्य करणारे प्रकाश आठवले हे नेने घाट गणेशोत्सव मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत.
पूर आला त्या दिवशी मी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये इयत्ता सातवीत शिकत होतो.
गुपचूप गणपती मंदिराच्या वाडय़ामध्ये आम्ही रहात होतो.
मी आणि भाऊ उल्हास आम्ही शाळेत असताना पूर आल्यामुळे शाळा लवकर सोडली होती,
असे प्रकाश आठवले यांनी सांगितले.
नारायण पेठेत लोखंडे तालीमजवळ कुलकर्णी यांच्याकडे गेलो होतो.
त्यांच्या घरापर्यंत पाणी आले होते.
