माझ्या शब्दाला एके काळी किंमत होती आता राहिली की नाही- सुशीलकुमार शिंदे
* रत्नाकर महाजन यांना राज्यसभेत नियुक्त करण्याची सूचना करणार!
संतोष भोसले ( शिव-कल्याण न्युज, रेडा प्रतिनिधी ) :
माझ्या शब्दाला एके काळी किंमत होती आता राहिली की नाही माहिती नाही.. तरीही डॉ रत्नाकर महाजन यांना राज्यसभेमध्ये घेण्याची सूचना निश्चित करेन असे उद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काढले.
इंदापूर येथील राधिका रेसिडेन्सी क्लब मध्ये मुंबई वृत्तपत्र संघ व राधिका सेवा संस्था यांच्यावतीने नियोजन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, सत्कारमूर्ती रत्नाकर महाजन, इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक. सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सत्कार समितीचे अध्यक्ष राजेंद्र तांबिले, यादव, अरविंद वाघ, ज मा मोरे, कालिदास देवकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,मुंबई वृत्तपत्र संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर गलांडे. जिल्हाध्यक्ष महेश स्वामी, रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीराव मखरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, साथी सलीम शेख, गटनेते कैलास कदम, काँग्रेस पक्षाचे काकासाहेब देवकर, ‘रमजान बागवान’ जकीर काझी, निवास शेळके’ गटनेते आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, इंदापूरचा आणि माझा संबंध जुनाच आहे. मी ज्यावेळी पहिल्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समाविष्ट झालो त्यासुमारास स्वर्गीय शंकराव पाटील हे दुग्धविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे इंदापूरचा व माझा संबंध जुनाच आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, रत्नाकर महाजन हे सुरुवातीपासूनच राष्ट्र सेवा दलामध्ये कार्यरत होते. युवक क्रांती दलामध्ये त्यांनी काम केले आहे. १९७५ साली दिल्ली येथील महात्मा गांधींचीच्या समाधीस्थळावर जावून प्रार्थना केली. आणिबाणीच्या काळात मतभेद झाले परंतु त्यांनी आपला काँग्रेस पक्षावरील निष्ठा कायम ठेवत काँग्रेस पक्षाचे विचार जपत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. डॉ. रत्नाकर महाजन यांनी काँग्रेसच्या शिबिरातून जे प्रबोधन केले ते आजमिती महत्त्वाचे आहे. रत्नाकर महाजन यांनी राज्याचे नियोजन मंडळाचे काम पाहिले आहे. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा’ याचे उत्तम उदाहरण म्हणजे रत्नाकर महाजन आहेत इंदापूरकरांनी महाराष्ट्राला दिलेले सर्वोत्तम रत्न म्हणजे रत्नाकर महाजन, त्यांची भाषणे व शिबिरातील वैचारिक भूमिका आजच्या घडीला खूप महत्त्वाची आहे. रत्नाकर महाजन यांना राज्यसभेमध्ये घ्यावे अशी सूचना मानतो परंतु पूर्वी माझ्या शब्दाला किंमत होती ती आता राहिलेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, रत्नाकर महाज एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व व सुसंस्कृत विचाराचे स्पष्ट वक्ते आहेत. त्यांचे एक वैशिष्ट्य आहे जिथे असतील तिथे प्रामाणिकपणे काम करायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. रत्नाकर महाजन हे नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष असताना त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाला 25% बजेट वाढवून दिले. त्यामुळे विकासात्मक काम करताना सुलभता निर्माण झाली. नियोजन मंडळाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनाही राबवता आल्या. नियोजन मंडळाचे बजेट वाढल्यामुळे प्रत्येक पालक मंत्र्याला काम करणे सोपे झाले होते.
डाॅ. रत्नाकर महाजन म्हणाले, काँग्रेस पक्षाला प्रबोधनाची परंपरा आहे.ती बंँनजी, नामदार गोखले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जोपासली. त्यामुळे काँग्रेस बळकट होत गेली. ती परंपरा खंडीत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची आजची स्थिती झालेली आहे. आज असणाऱ्या सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रवाद खोटा व दिखावू आहे. धर्मनिरपेक्षता लोकशाही समाजवाद आणि राष्ट्रीय एकता काँग्रेस जोपासली ती परंपरा आजच्या सत्ताधाऱ्यानी गुंडाळून ठेवलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणालाही देशद्रोही ठरविण्याचे प्रमाणपत्र सरकारने घेतले आहे. देशद्रोहाचे कलम कायद्यात समाविष्ट करू नये म्हणून पंडित नेहरू आग्रही होते. परंतु लोकांच्या आग्रहाखातर देशद्रोहाचे कलम नेहरूंनी स्विकारले असे रत्नाकर महाजन यांनी आपले सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णाजी यादव यांनी केले सूत्रसंचालन जितेंद्र जाधव यांनी केले तर आभार महारुद्र पाटील यांनी मानले.
चौकट:
* काँग्रेस पक्षातून इतर पक्षामध्ये गेलेले पुन्हा स्वगृही परत येतील असे सुशीलकुमार शिंदे यांनी सुतोवाच केला.
* कार्यक्रमाच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला त्यावर हर्षवर्धन पाटील म्हणाले सध्या महा विकास आघाडीचे सरकार आहे यावर सभागृहात हशा पिकला.
