अनिल देशमुखांचा पाय खोलात;
मे.न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर ई.डी.नं बजावलं पाचव्यांदा समन्स!
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ई.डी.च्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं,
याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी मे.सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
मात्र,मे. न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर आता ई.डी.नं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे.
ई.डी.नं अनिल देशमुख यांना बजावलेलं हे पाचवं समन्स आहे.
सकाळी राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना ई.डी.नं चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असून आता तरी अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का?
असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ई.डी.ची छापेमारी…
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत.
या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ई.डी.कडून चौकशी सुरू आहे.
या कारवाईमध्ये ई.डी.नं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे.
त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ई.डी.चा फास अधिकाधिक आवळला जात आहे.
नुकतेच ई.डी.नं अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रकरणामध्ये चौकशीसाठी याआधी अनिल देशमुख यांच्यासोबतच त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना देखील ई.डी.नं चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
मात्र, अद्याप अनिल देशमुख यांची चौकशी होऊ शकलेली नाही.
