डॉक्टरांविरोधातील तक्रारी ,
पडताळणीसाठी पोलिसांचा विशेष विभाग : राज्य सरकारकडून मे.उच्च न्यायालयात माहिती
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
मुंबई : उपचारांतील हलगर्जीप्रकरणी डॉक्टरांविरोधात रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींवरून थेट गुन्हा दाखल न करता त्याची शहानिशा करण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेला विशेष पोलीस विभाग स्थापन करण्यात येणार आहे.
राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी त्याबाबतची माहिती मे. उच्च न्यायालयात दिली.
औषधांच्या तुटवडय़ामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही.
परिणामी रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांविरोधात पोलिसांकडे तक्रार करतात.
पोलीसही डॉक्टरांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवतात.
डॉक्टरांना यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो.
या सगळ्यांपासून डॉक्टरांचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांचा विशेष विभाग सुरू केला जाणार असून डॉक्टरांवर हल्ले करणारे,
रुग्णालयात घुसून तोडफोड करणाऱ्यांवर यापुढे भारतीय दंडविधानानुसार कारवाई केली जाईल,
असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
करोनाकाळात डॉक्टरांवरील हल्ल्यामध्ये वाढ झाली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी डॉ. राजीव जोशी यांनी अॅड. नितीन देशपांडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.
विशेष विभागात यांचा समावेश पोलिसांच्या या विभागात वैद्यकीय तज्ज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान असलेल्या आय.पी.एस. अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर वा रुग्णालयाविरोधात करण्यात येणाऱ्या वैद्यकीय निष्काळजीच्या तक्रारींची या विभागाकडून पडताळणी केली जाईल.
