पिण्यासाठी उजनीतुन आवर्तन सोडले,1800 क्युसेस वेगाने
सोलापूर शहर आणि नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी गुरूवारी दि.20 रोजी सकाळी 11 वाजता भीमा नदीपात्रात पाणी सोडले. उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात 1800 क्युसेस क्षमतेने विसर्ग देण्यात आला. तर मुख्य कालव्यामधून 3150 क्युसेस तर बोगदा 560 क्युसेस इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा सध्या उणे झालेला आहे.उजनी धरणामध्ये एकूण 117 टी.एम.सी.पाणीसाठा असतो.त्यापैकी 63 टी.एम.सी.पाणीसाठा हा मृत अवस्थेत असतो. गतवर्षी आँक्टोंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. 14,15 व 16 आँक्टोबर रोजी पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पुर आला होता. उजनी धरणामधून ही मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता.नोव्हेंबर पासून सहा महिन्यात उजनी धरणामधून 54 टी.एम.सी पाणी वापरले गेले आहे.
सहा महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे,सोलापूर आणि नगर भागातील शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी हे पाणी खर्च केले आहे असे स्पष्ट होते.तीन महिने पंधरा आँगस्ट पर्यंत हा पाणीसाठा वापरावा लागणार आहे. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी जर आणखी आवर्तन देण्याची वेळ आली तर हे धरण चाळीस टक्के मृतसाठ्यात कमी होऊ शकते,असे झाले तर इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे पाईप लाईन लांबवावी लागणार. तसेच इंदापूर नगरपरिषदेची पाणी पुरवठा योजना अडचणीत येवू शकते. लिफ्ट पासून पाणी दूर अंतरावर गेल्याने चारी काढून पाणी जलशुध्दीकरणाच्या केंद्रापर्यंत आनावे लागणार आहे.या सर्व संभाव्य बाबी लक्षात घेऊन उर्वरित काळात उजनीच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.
