दि- 20 एप्रिल 2025 वार: रविवार
“आठवणींचा ठेवा” – वालचंद विद्यालय कळंब मध्ये 23 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
नुकतीच दहावी 2002 वालचंद विद्यालयाच्या बॅचचा “आठवणींचा ठेवा” हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात आणि प्रेमळ वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला 79 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, नियोजनबद्ध व आनंदाने सहभाग घेतला. सर्वांनी पूर्व नोंदणी करत शिस्तबद्ध उपस्थिती लावली.
या मेळाव्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी – शिक्षण, आरोग्य, पोलिस, विज्ञान-तंत्रज्ञान, फायनान्स, शेती, उद्योजकता अशा सर्व क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. वर्गातील किस्से, शाळेची घंटा, परीक्षा आणि बालपणातील रम्य आठवणी यावर आधारित गप्पा, गाणी, कविता यांचा समावेश असलेल्या चर्चासत्रामुळे कार्यक्रम रंगतदार झाला.
सामाजिक जाणीवेतून केलेली भेट – CCTV DVR सिस्टीम
या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी असलेली कृतज्ञता व सामाजिक जबाबदारी जपत, शाळेसाठी CCTV कॅमेरा सिस्टीमची DVR युनिट बसवून दिली. विद्यार्थ्यांनी सांगितलं की, “शाळेने आम्हाला खूप काही दिलं, आता आमचं काही देणं लागतोय.” ही भेट शाळेच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणार असून, भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
विशेष उल्लेख – आदरणीय सौ. पूर्वा कुलकर्णी मॅडम
पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहिलेल्या सौ. पूर्वा कुलकर्णी मॅडम यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी विशेष भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या शब्दांत सांगायचं झालं, तर – “तुमचं एक-एक शब्द, शिकवलेला प्रत्येक धडा, आजही आम्हाला निर्णय घेताना बळ देतो. इस्रो किंवा नासाच्या उपग्रहासारखेच, आम्ही तुमच्या पाठिंब्यामुळे शिक्षणाच्या व कळंब गावाच्या कक्षेतून बाहेर पडून स्वतःची दिशा, गती आणि ओळख निर्माण करत आहोत. कालच्या भेटीतही तुमच्यातील शिक्षकाची तीच तळमळ, प्रेम आणि अपेक्षा दिसून आली. आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत, याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे.”
प्राचार्य सुरेश अर्जुन सरांनी नमूद केलं की, “मी स्वतः या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आज प्राचार्य म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांचा शिक्षक, मार्गदर्शक आणि सहकारी होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
श्री.अरूण चव्हाण सर, रतन कुंभार सर, पाठक सर, पारठे सर, गाडेकर सर, शेलार सर, रायबा कुंभार सर, तसेच प्राथमिक विभागाच्या शेख मॅडम, सौ. पूर्वा कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या प्रेमळ शब्दांनी विद्यार्थ्यांना आठवणींच्या प्रवाहात भिजवलं. डोंबाळे सर, अर्जुन सर, सोलनकर मॅडम, उदगीरकर मॅडम यांनी देखील उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करून शाळा व माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी संवाद तयार केला.
“आठवणींचा ठेवा” हा मेळावा म्हणजे केवळ एक भावनिक सोहळा नव्हता, तर विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेलं प्रेम, कृतज्ञता आणि नाते पुन्हा एकदा दृढ केलं. वालचंद विद्यालयाच्या यशाच्या वाटचालीत हा मेळावा एक मानाचा तुरा ठरेल.”
