हर्षवर्धन पाटील तंबूत घुसला तर.. तंबूच शिल्लक ठेवायचा नाही – दशरथ माने यांची टीका

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर, दि. ११ : हर्षवर्धन पाटील तंबूत घुसला तर… तंबूच शिल्लक ठेवायचा नाही, विधानसभेच्या जागे संदर्भात घेतलेला निर्णय बदला, अन्यथा आम्ही बंडखोरी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनी आज दिला.
इंदापूरमधून आम्ही शंभर नव्हे; एकशे दहा टक्के अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आम्ही आता फार्म काढत नसतो. आम्ही एकवेळ जेलमध्ये बसू, पण निवडणूक लढवू. तुम्ही आम्हाला मतं द्याल, असे आवाहन करत, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी इंदापूरमधून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
इंदापूर चे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याचा चुकीचा निर्णय घेऊ नका. साहेब हा पठ्ठ्या जर तंबूत घुसला तर अख्खा तंबूच घेऊन जाईल, असं म्हटलं होतं आणि तसेच झालं. आमचा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा तंबूच ते उचलून घेऊन गेले आहेत, असा हल्लाबोल माने यांनी केला.
आजच्या परिवर्तन सभेत माने आक्रमक झाले होते.
यावेळी व्यासपीठावर या परिवर्तन मेळाव्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, कांतीलाल झगडे, बाबासाहेब चवरे, बाळासाहेब हरणावळ, शकील सय्यद, बापू जामदार, अर्शद सय्यद, पांडुरंग मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, आमचा आवाज कोणीही थांबू शकत नाही. कारण प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. प्रामाणिकपणा आमच्यात आहे. नेता नसताना इंदापूर तालुक्यातील प्रामाणिक जनतेने खासदार सुप्रिया सुळे यांना 26 हजार मतांची आघाडी दिलेली आहे. आता हा पट्ट्या म्हणतो, अदृश्य शक्तीने आघाडी दिली आहे. अरे कोणती रे अदृश्य शक्ती आहे. कोणत्या गावातलं पाणी पिऊन आलाय तुम्ही. स्वर्गीय शंकरराव पाटील तथा भाऊंच्या पुतळ्यासमोर उभे राहून खोटे बोलत आहात. भाऊंना काय वाटले असेल, याचा जरा तरी विचार करा. तुम्ही घोलप कुटुंबीयांना बाजूला केले. भाऊंची कन्या पद्माताई भोसले यांना कारखान्यातून बाजूला केले. शहा कुटुंबीयांना संस्थेपासून दूर केले हे पाप आहे. ही जनता आणि भाऊ कधीही माफ करणार नाही, असे जगदाळे म्हणाले.
यावेळी प्रवीण माने, भरत शहा, यांची भाषणे झाली.
