जि.प.प्राथमिक शाळा काटीतील बाल वारकऱ्यांचा हरिनामाच्या गजरात पायी दिंडी सोहळा

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
समाजातील सर्व प्रकारची विषमता नाकारणारी,सर्वांना सोबत घेऊन जाणारी चळवळ म्हणजे वारी.मराठी महिन्यातील आषाढ महिना सुरू झाला की वारकऱ्यांच्या मनात चाहूल लागते ती आषाढी पायी वारीची.ही पंढरीची वारी हजारो वर्ष झाली अविरतपणे चालू आहे.” *पंढरीची वारी करी वारकरी। ऊन पावसाची चिंता कोण करी।”* याप्रमाणे असंख्य वारकरी भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी पायी वारीत चालत जातात.आषाढी वारी म्हणजेच महाराष्ट्राचा मोठा सण या परंपरेची व संतांची आपल्या बालचूमुंना जाण व्हावी याच उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटी या ठिकाणी बाल वारकऱ्यांची पायी दिंडी काढत हरी नामाच्या गजरात भजन,अभंग म्हणत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटी येथून तुकाराम महाराजांच्या दिंडीचे प्रस्थान केले. विठ्ठल नामाच्या गजरात हे बाल वारकरी रंगून जाऊन बाल वारकऱ्यांनी विठ्ठलाची भक्ती गीते, टाळ मृदुंगाच्या तालात फुगडी व नृत्य केले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक कचरे व त्यांचे सहशिक्षक विकास शेंडे,बाबासाहेब राऊत यांनी विद्यार्थ्यांची पायी दिंडी सोहळा आयोजित करून या बाल चिमुकल्यांच्या मनात आपल्या भारतीय संस्कृतीची जाण व्हावी या उद्देशाने दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.अवघा परिसर हरिनामाच्या गजरात,विठुरायाच्या गजरात दुमदुमला होता.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघमोडे यांच्या वतीने बाल वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला.तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी या दिंडी सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले.
