
इंदापूरमध्ये दोघात तिसरा…. आता सगळं विसरा !
प्रदीप तरंगे, ( शिवकल्याण न्यूज नेटवर्क )
दि. ८ : इंदापूर तालुक्यातील जनतेचे मतदान कोणाच्याही हक्काचे नाही. तालुक्यात चांगले शासन हवे असेल तर तिसरा पर्याय देणे गरजेचे आहे. येणाऱ्या ११ तारखेला इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मेळावा होईल, त्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवीण माने यांनी इंदापूर येथील पत्रकार परिषदेत केले व तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले.
यावेळी बोलताना आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले की २०१४ ला मी शरद पवार व सुप्रिया ताईंकडे उमेदवारी मागितली होती. त्यानंतर २०१९ ला अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटलांसमोर हर्षवर्धन पाटील यांनी मला शब्द दिला की आता तुम्ही माझे काम करा २०१४ ला मी तुमचे काम करतो. तसेच निराभिमा कारखान्यात २०० ते ३०० शेतकऱ्यांना सभासद करून घेतो,परंतु प्रत्येक वेळेस फसवणूक केली. आताही लोकसभेत अदृश्य हाताने बेइमानी केली याची कबुली दिली. तालुक्यात यांच्या इतका लबाड माणूस नाही, अशा शब्दांत हर्षवर्धन पाटलांचा समाचार घेतला. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा उपस्थित होते.
