शिव-छत्रपतींची प्रासंगिकता – प्रा. डॉ. डी. ई मनेरे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
ज्या काही ख्यातनाम व कर्तबगार व्यक्ती होऊन गेल्या त्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अग्रक्रम प्राप्त होतो.कारण शिवाजी महाराजांच्या लढाया व विजयाच्या,पराक्रमाच्या कथा आजही प्रत्येक भारतीयांच्या घरा-घरातून गायल्या जातात.परंतु त्यांच्या कार्य कर्तुत्वाचे महत्व समजून घेणे हे इतके सोपे काम नाहीए. तेंव्हा असे वाटते की,शिवाजी महाराजांचा उदयकाळ हाच मराठ्यांचा देखील उदय काल ठरतो.कारण त्यांनी बलहीन असलेल्या,विखुरलेल्या आणि अडगळीत पडलेल्या मराठा समाजाला एकत्र केले आणि त्यांना नवीन शक्ती प्रदान करून एका आधुनिक व पुरोगामी मराठा साम्राज्याची निर्मिती केली.कधी काळी शेती व पशुपालन आणि सैनिकी सेवा देणाऱ्या मराठा समाजाच्या हातात छ.शिवाजी महाराजांनी नांगर सोडून शूर-वीरांचे लक्षण मानले गेलेली तलवार प्रदान केली आणि सैनिकि पेशासाठी समाजाला प्रेरित व प्रोत्साहित केले. त्यामुळेच नंतरच्या काळात मराठे हे मोठ-मोठे जमीनदार व राजे आणि सर्वांगीण सत्तेचे केंद्रबिंदू बनलेले दिसतात.आजही हि बाब बऱ्याच प्रमाणात जशाश-तशी लागू पडते असे महटले तर वावगे ठरू नये.
वास्तविकता छ. शिवाजी महाराजांचा व्यक्तिगत भूतकाळ पहिला तर त्यांचे पूर्वज हे पुणे व त्याच्या आस-पासच्या प्रदेशातील गावात पाटीलकी व शेत-जमीन कासनारे होते.नंतरच्या काळात त्यांचे वडील कधी निजामशाही तर कधी आदिलशाही मध्ये जहागिरी करतांना दिसतात.ही जहागीरीची कामे करीत असतांना शहाजी राजांना ज्या विविध व कठीण अशा परिस्थितीचा,अनुभवांचा सामना करावा लागला त्याचे फार मोठे व दूरगामी परिणाम राजमाता जिजाऊ व छ.शिवाजी महाराज यांच्या मनावरती पडलेले दिसुन येतात.कदाचित म्हनुनच नंतरच्या काळात माता जिजाऊ यांनी आपल्या मुलास जाणीवपूर्वक स्वराज्याचे बाळकडू पाजले असावे असे वाटते.त्यामुळेच इतर कोणाही गुरु पेक्षा छ.शिवाजी महराजांच्या व्यक्तीमात्वावर माता जिजाऊ यांच्या विचार व व्यक्तीमात्त्वाचा प्रभाव हा सर्वात जास्त पडलेला दिसून येतो.हे आपणास शिवाजी महाराजांच्या नंतरच्या कार्य- कर्तुत्वा वरून स्पस्टपणे जाणवते.छ. शिवाजी महाराजांचा राजकीय कालखंड जरी त्या अर्थाने मध्ययुगीण असला तरी कार्य,कर्तुत्व आणि राज्यकारभाराची सर्वांगीण नीती या दृष्टीने त्यांचे सर्वांगीण साम्राज्य हे खूप पुढारलेले,आधुनिक व पुरोगामी स्वरूपाचे वाटते. याचे स्पस्ट प्रतिबिंब त्यांच्या राज्याभिषेका नंतरच्या कार्यवाहीत दिसून येते.त्यांच्या राज्यकारभाराच्या नीतीची सर्वव्यापीपणा,सर्वसामावेशकता,न्यायप्रियता आदी काही महत्वाची पैलू होती.म्हनुनच छ.शिवाजी महाराजांची राजेशाही ही प्रबुद्ध निरंकुश राजेशाही च्या कक्षेत येते.साम्राज्याची वाढ ,वकास आणि रयतेचे कल्याण हाच त्यांच्या कार्याचा एकमेव अजेंडा होता.त्याच बरोबर गद्दार आणि साम्राज्य विघातक व्यक्ती व शक्ती यांची त्यांनी कधीही तमा न बाळगता अगदी बेमालूमपणे त्यांचा बिमोड केला हे ही आपण विसरता कामा नये !
न्यायप्रियता हे छ.शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे व प्रमुख असे अंग होते.त्या काळात विशिष्ठ वर्गाला (वर्णाला) असलेले विशेष स्थान आणि इतरांच्या बाबतीत केलाजाणारा वर्णीय भेदभाव महाराजांना कधीच मान्य नव्हते.ते “कायद्यासमोर सर्व समान” या आधुनिक न्यायिक तत्वाचा स्वीकार करणारे तात्कालीन काळातील सर्वश्रेष्ठ न्यायी राजा(न्यायाधीश) होते.त्यांनी राज्याभिषेका नंतर सर्वात वरच्या वर्णातील लोकांना ही (ज्यांना शिक्षेत विशेष सुट होती,समाजात इतरांपेक्षा विशेष वागणूक व स्थान होते) त्यांनाही छत्रपतींनी कायद्याच्या कक्षेत आणून कायदेशीर शिक्षा फर्मावल्या तसेच न्यायदान करीत असत्तांना आपला व परका,उच्च-नीच असा भेदभाव कधीही केला नाही. त्यांच्या याच न्यायिक नीतीचा,विचारांचा अवलंब व अनुकरण आज आपल्या भारतीय राज्यघटनेत केलेले आहे असे आपणास नाही का वाटत ?
छ. शिवाजी महाराजांनी जरी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असली तरी त्यांनी इतर धर्मियांच्या-वर्गीयांच्या बाबतीत कधीही नकारात्मक किंवा द्वेशात्मक भूमिकेचा अंगीकार केला नाही.साम्राज्याच्या आजु-बाजुला संपूर्ण मुस्लीम सत्ताधीशांचा वेढा असत्तांनाही व त्यांचा पराकोटीचा आपल्या साम्राज्याला विरोध असतांनाही अगदीच उदार अंतकरणाने त्यांनी मुस्लिमासह इतरांनाही आपल्या साम्राज्यात अगदी सहजपने सामाहून घेतले व नीतीने,धर्माने राज्य केले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुस्लीम व मारठेत्तर सैनिकांना आपल्या साम्राज्यात सामाहून घेऊन मोक्याची आणि मानाची सैनिकी पदे अगदी निशंकपणे बहाल केली. म्हणजेच आधुनिक युगाच्या,जगाच्या भाषेत त्यांनी त्या काळात पराकोटीची धर्म निरपेक्षता व धार्मिक सहिष्णुता बाळगली होती जी आजही आपल्या दृष्टीने कळीचा मुद्दा असून जीवन जगण्याचे एक तत्व म्हणून आपणास आजही संपूर्णपणे या तत्वाचा आत्मस्वीकार करता आलेला नाही.अगदी स्वतंत्र्या नंतर आपण घटनात्मक दृष्ट्या धर्म निरपेक्ष भारत हे तत्व म्हणून स्वीकारले असले तरीही !
समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या भारतीय स्त्रिया प्राचीन काळामध्ये विकासाच्या व प्रगतीच्या शिखरावरती विराजमान होत्या परंतु मध्ययूगीण काळात जी नकारात्मक सामाजिक-धार्मिक-राजकीय स्थित्यातरे आली त्याचे खूप मोठे वाईट व नकारात्मक परिणाम स्त्रियांच्या सामाजिक,धार्मिक स्थिती आणि दर्जावर्ती पडलेले आहेत .परंतु छ.शिवाजी महाराजांचा कालखंड याला अपवाद ठरतो.कारण छ. शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या बाबतीत अगदीच श्रेष्ठ,आधुनिक व पुरोगामी अशा नीती,धोरणाचा अवलंब केला.एवढेच नाही तर स्त्रियां विषयी आदरात्मक व आदर्श नीती-नियम निर्मा करून आपल्या साम्राज्यात नेहमीच त्यांचा मान-सन्मान केला,उदार धोरण स्वीकारून त्यांच्या कर्तुत्वाला चालना दिली.पर स्त्री माते समान मानून स्त्रींयांची कधी ही विटंबना होऊ दिली नाही आणि होणार नाही याची ही काळजी घेतली.असे म्हटले जाते की या राजाच्या दरबारात कधीही स्त्री नर्तकी महणून सादर झाली नाही.त्यांनी स्त्रियांच्या सर्वांगीण हिताला व सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले.स्त्रियांच्या बाबतीत इतकी उदार,आधुनिक,पुरोगामी व न्यायी भूमिका व धोरण स्वीकारणारे छ. शिवाजी महाराज हे तत्कालीन काळातील एकमेव असे सुधारक राजे ठरतात.भारत देशाच्या संविधानात देखील स्त्रीयांच्या विषयी धोरण ठरविताना छ. शिवाजी महाराज यांनी स्वीकारलेला स्त्री विषयक दृष्टिकोन नितीदर्शक ठरलेला आहे. अर्थात तो विचार महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ.आंबेडकर यांनी नंतरच्या काळात उचलून धरला.ती भिमिका व विचार नंतरच्या काळात स्त्रियांच्या हक्काच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरली आहे या बाबत तिळमात्र शंका नाही.
आपल्या देशाची भौगोलिक रचना सांगते की आपल्या देशाचे भौगोलिक स्थान हे द्विप्कल्पिय आहे.म्हणजे आपल्या देशाच्या तिनही बाजूने समुद्र अथवा पाणी आहे आणि एका बाजूने भूमी तेव्हा आपल्या देशाच्या सुरक्षेला किंवा साम्राज्याला सर्वात जास्त मोठा धोका हा समुद्री मार्गाने होऊ शकतो याचा सर्वात प्रथम विचार जर कोणी केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांनीच. त्या अनुषंगाने त्यांनी तत्कालीन काळातील अत्यंत प्रबळ व सर्वात सक्षम असे आरमार (सागरी सुरक्षा दल ) त्याकाळात निर्माण केले आणि सागरी सीमांपासून आपल्या साम्राज्याला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेतली व भविष्या साठी आपणास जागृत केले. म्हनुनच आधुनिक भारतीय सागरी सुरक्षा ( इंडियन नेव्ही ) दलाची निर्मिती करतांना शिवाजी महाराजांच्या सागरी सुरक्षा नीती चा बारकाईने अभ्यास केला गेला व त्या धर्तीवर्ती आज आपण अतिशय बलशाली असे सागरी सुरक्षा दल,सागरी साम्राज्य उभारले आहे.आजही भारत देश छ.शिवाजी महाराज व त्यांची सागरी सुरक्षा नीती व धोरण या बाबतीतील त्यांच्या मार्गदर्शना बद्दल त्यांचा सदैव ऋणी राहील.
आजचे भारत देशाचे किंवा महाराष्ट्र राज्याचे कृषी धोरना वरती द्रस्टीक्क्षेप टाकला तर असे दिसते की,ही आधुनिक सरकारे आपल्या शेतकर्यांना आधुनिक शेतकी अवजारे,तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, तंत्र-यंत्रे, बी-बियाणे, खते, पीकविमा इत्यादी सुविधा सह दुष्काळ,अवर्षणजन्य परिस्थिती किंवा इतर नैसर्गिक संकटे यात आर्थिक व इतर प्रकारच्या सर्व मदत व सेवा-सुविधा पुरवतात.परंतु हे शेतीविषयक आधुनिक व गतिशील कृषी धोरण वा नीती कुठून व कोणाकडून स्वीकारण्यात आली आहे याचा कधी विचार केला आहे का ? अर्थातच नाही परंतु आज आपल्या सरकारद्वारे ज्या काही शेतीविषयक धोरना चा अवलंब केला जात आहे व राज्य आणि देशाला व शेतकर्यांना समृधीच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे त्या आजच्या सर्व कृषी धोरण व नीतीचे निर्माते हे छ.शिवाजी महाराज आहेत याचा आपणास अभिमान वाटला पाहिजे.
छ.शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यात सर्व शेतक-र्ना त्यांचे उत्प्न्न वाढावे,त्यांची आर्थिक भरभराट व्हावी व राज्याला अधिक महसूल,कर मिळावा असा धोरणी उद्देश समोर ठेऊन शेतकर्यांना नांगर,बी-बियाणे व इतर आवश्यक शेतकी अवजारे त्या काळामध्ये पुरवले. एवढेच नाही तर दुष्काळ, आवर्षण,नैसर्गिक संकटे किंवा युद्ध ई. कारणांमुळे शेतकर्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नसेल किंवा नुकसान झाले असेल तर अशा परिस्थितीत शेतकर्यांना करात, महसुलात सूट दिली जात असे. महसूल भरण्यासाठी पेशवे काळात जी निश्चित वेळेत महसूल भरण्याची सक्ती,जबरदस्ती केली जात असे तसी सक्ती शिव काळात कधीही केली गेली नव्हती .सैनिकांच्या घोड्यांसाठी लागणारी वैरण शेतकर्यांकडून विकत घ्यावी अशी स्पस्ट ताकीद त्यांनी आपल्या सैनिकांना दिली होती.युद्ध किंवा स्वारीच्या वेळेस मार्गक्रमण करताना आपले सैन्य शेतकर्यांच्या पिकामधून नेऊ नये अशा सैनिकांना सूचना होत्या. त्यांचे पालन केले नाही तर सैनिकास शिक्षा ठोठावली जात असे व शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली जात असे.शेतकर्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये अशी आपल्या सैनिकांना स्पस्ट केले होते.
अशी ही एकंदरीत छ .शिवाजी महाराजांची प्रबुद्ध राज्यशाही होती त्यांच्या राज्यशाहीला देखील लोकशाही मुल्यांची झालर ,चाड व जाणीव होती याची आपल्याला जाणीव असणे,भान असणे काळाची गरज आहे.त्यांना लोक कल्याणाची, रयतेच्या हिताची आस होती.प्रजेला,रयतेला त्यांचे जीवन जगणे सुसाह्य झाले पाहिजे,राज्य कायद्याने ,नीतीने व नियमाने चालले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता,न्याय व्यवस्था गतिमान होती त्यात पक्षपाती पणाला मुळीच थारा नव्हता, ज्या काळात जात-पात ,धर्मभेद अगदी विकोपाला गेले होते अशा काळात छ.शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचे तत्व आमलात आनले व त्या अर्थाने धर्म निर्पेक्षता जोपासली,आठरा पगड जातींच्या कर्तुत्वाला संधी देऊन सर्व समावेशक राज्यकारभार केला आणि सर्वांना सोबत घेऊन राज्य चालवले तर अशक्य ते सर्व शक्य होऊ शकते असा आपणास मूलमंत्र दिला .म्हणूनच आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात राहूनही आणि स्वातंत्र्य, समता,बंधुत्व आणि न्याय या जीवन पद्धतीचा अंगीकार करूनही एका निरंकुशपने राज्य चालवणाऱ्या योध्याचे मुक्तपणे गुणगान गावे लागते हि बाब छ.शिवाजी महाराजांचे व्यक्ती व कार्य आणि आजचे त्यांचे समकालीन महत्व दशविण्यासाठी पुरेशी बाब आहे.तेव्हा अशा या महान लोकहितदक्ष,लोकशाहीवादी प्रबुद्ध निरंकुश राजास त्यांच्यां जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!
प्रा. डॉ. डी. ई मनेरे
(७८७५००५०५४)
विश्वासराव रणसिंग महाविद्यालय,कळंब-वालचंदनगर
